भारतात नर्मदा परिक्रमेला मोठे महत्त्व आहे. कर्दळीवन, पीठापूर, कुरवपूर आदींच्या परिक्रमाही केल्या जातात; पण २४ दत्तक्षेत्रे जोडून केल्या जाणाऱ्या परिक्रमेबद्दल अनेकांना माहिती नसते. प्रा. क्षितिज पाटुकले यांनी स्वतः ही परिक्रमा करून त्याविषयीचे अनुभव, दत्तक्षेत्रांची महती ‘श्रीदत्त परिक्रमा’ या पुस्तकातून दिली आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात दत्तात्रेय अवतार व कलियुगातील दत्त माहात्म्य यावर विवेचन केले आहे. श्री दत्तसंप्रदाय आणि परंपरा, दत्तात्रेयांचे प्रमुख शिष्य, २४ गुरू यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. श्रीदत्त परिक्रमा म्हणजे काय हेही स्पष्ट केले आहे. या परिक्रमेबाहेरील दत्तक्षेत्रांची माहितीही यात आहे. दुसऱ्या भागात परिक्रमेतील तीर्थस्थानांचा परिचय होतो. त्याची सुरुवात पुण्यातील शंकर महाराज मठापासून होते. औदुंबर, नृसिंहवाडी, अमरापूर, पैजारवाडी, कुडुत्री, बाळेकुंद्री, केंगरी, मुरगोड, कुरवपूर, मंथनगोड, कडगंची, ला़डचिंचोळी, माणिकनगर, बसवकल्याण, गाणगापूर, अक्कलकोट, लातूर, माहूर, कारंजा, भालोद, नारेश्वर, तिलकवाडा आणि गरुडेश्वर आदी २४ स्थानांची महती यात सांगितली आहे. प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणचा संपर्काचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आदी माहितीही यात नमूद केली आहे.
पुस्तक : श्रीदत्त परिक्रमा
लेखक : प्रा. क्षितिज पाटुकले
प्रकाशक : कर्दळीवन सेवा संघ
पृष्ठे : १६८
मूल्य : ३०० रुपये
(‘श्रीदत्त परिक्रमा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)